समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

मंगळवार, एप्रिल ०६, २०१०

मी पाहिलेले कोकण - १

दोन मोठ्या बॅग्ज हॉलमध्ये ठेवलेल्या होत्या. म्हणजे नक्कीच आम्ही कुठेतरी जाणार आहोत. रात्री झोपताना बाबांनी आईकडून सकाळी लवकर उठण्याचे कबुल करून घेतले कारण जर निघायला उशिर केला तर खूप ट्राफिक लागेल आणि मग ड्रायव्हिंगचा आनंद घेता येणार नाही. नंतर लगेच आईने माझ्याकडून कबुल करून घेतले, शनू सकाळी लवकर उठायचे, रडायचे नाही. आपण कोकणात फिरायला जाणार आहोत.

बरेच प्रश्न मनात आले, कोकण म्हणजे काय? आम्ही तिकडे का जातोय? पण मग मला आठवले बाबा आईला नेहेमी हाक मारतात ’ओ कोकणी माणसांनो’, या सगळ्यात मला पटकन झोप लागली.

कबुल करून घेतल्याप्रमाणे आईने मला पहाटे पहाटे उठवले, आंघोळ न घालताच मला पावडर लावून टि-शर्ट आणि फुल चड्डी घातली, मी तयार झालो सुद्धा. बाबा मला सांगत होते, आर्यन ही तुझी दुसरी लॉंग ड्राईव्ह.

मस्त वाटत होते गार हवा, रस्त्यावर कमी गर्दी. आम्ही साधारण नऊ वाजताच वडखळला पोचलो. लवाट्यांकडे मस्तपैकी मिसळपाव आणि गरम गरम बटाटेवडे हादडले बाकिच्यांनी. मी ईडली चटणी. नंतर बाबांनी जी गाडी सुरू केली ती डायरेक्ट महाडला नेवून थांबवली. आई महाडला लहानपणीची काही वर्षे राहिले होती. तेव्हाचे ती रहात असलेले भाड्याचे घर, तिची शाळा, फेव्हरेट बेकरी असे काय काय बघत आम्ही विन्हेरला पावणेबाराला पोचलो. विन्हेरे हे एक खेडेगाव आहे महाड तालुक्यातले. तिथे आईची मावशी रहाते.
तिथे पोचल्या पोचल्या मला चांगला प्रसाद मिळाला. मी आणि बाबा घराच्या पायर्‍यांवर बसलो होतो. माझ्या पायात सॉक्स होते त्यामुळे पटकन माझा पाय घसरला आणि मी तिसर्‍या पायरीवरून डायरेक्ट जमिनीवर येवून पडलो. माझ्या ओठाला आणि हनुवटीला थोडेसे लागले. आई बाबांवर रागावली त्यांनी माझ्यावर नीट लक्ष न ठेवल्याने मी पडलो म्हणून आणि बाकीचे सगळे आईवर रागावले, बारिकश्या खरचटण्याचा एव्हढा बाऊ केल्यामुळे.

मावशी आजीचे घर खूप मोठे आहे. भरपूर खोल्या, मागे पुढे आंगण, घराच्या शेजारीच छोटीशी नदी, आजुबाजूला भरपूर आंबा, फणस, चिकू अशी झाडं. मी पहिल्यांदा झाडावर लागलेला चिकू पाहिला.

संध्याकाळी आम्ही जवळच फिरून आलो, कोकण रेल्वेचे रूळ बघितले. दिवसभर खूप खेळून, फिरून रात्री लवकर झोपून गेलो.

दुसर्‍या दिवशी सकाळी नाष्टा करून आम्ही बाहेर पडलो आणि आलो दापोलीला. जिथे आईचा मामा रहातो, माझे मामाआजोबा. त्यांचे घर पण मावशीआजी सारखेच होते थोडे फार. मोठे घर, आंगण, सुपारी, दालचीनी, जायफळ, अशी झाडे. मामाआजोबांकडे मनीमाऊ पण होती दोन दोन. एक छोटे पिल्लू आणि त्याची आई. ते पिल्लू माझ्या मांडीत पण येवून बसले होते. मला खूप आवडले ते. पण मी त्याला हातात धरल्यावर ते पटकन उडी मारून पळून गेले. मग मी खूप वेळ रडलो. दुपारी जेवून आराम करून संध्याकाळी आम्ही दाभोळला आलो. तिथे आम्ही आमच्या गाडीसकट फेरीमध्ये बसलो आणि पंधरा मिनिटात दाभोळमधून गुहागरला पोचलो. फेरीबोटीत खूप मज्जा आली.

गुहागरला पोचल्या पोचल्या आम्ही लगेच समुद्रावर गेलो. मी समुद्र कधिच पाहिला नव्हता, एव्हढे सगळे पाणी, खळखळ आवाज करत आमच्या दिशेने येणार्‍या लाटा बघून माझी जाम घाबरगुंडी उडाली. आईने माझ्यासाठी मारे बिचवेअर चड्डी आणली होती, हौशीने मला घातली सुद्धा. पण मला काही हा समुद्र नावाचा प्रकार बिलकुल पसंत पडला नव्हता. मी वाळूवर पाय सुद्धा टेकायला तयार नव्हतो तरी मला उभे केले आणि असा रडका फोटो पण काढला.

शेवटी नाईलाजाने मला घेवून सगळे बाहेर आले, मला नेहेमीचे कपडे सुद्धा घातले. तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. मग आम्ही दुर्गादेवी आणि व्याडेश्वराचे दर्शन घेवून चिपळूणच्या दिशेने प्रवास सुरू केला. आम्ही रात्री ९ वाजता चिपळूणला पोचलो. मी गाडीतच झोपुन गेल्याने मला हे दुसर्‍या दिवशी कळले. सकाळी छान थंडी होती बाहेर, झाडांवर वेगवेगळे पक्षी ओरडत होते.

चिपळूणच्या घराच्या मागेच डोंगर आहे. तिथेतर ढगच खाली आले होते. आईने सांगितले, ते धुकं आहे. पण मला वाटतं ते ढगच होते. मी आणि आई चुलीजवळ बसलो होतो, शेकायला. आई चुलितल्या ज्वाळांवर हात धरायची आणि चेहेरा, हात, पायांवर हात ठेवायची, मस्त गरम गरम वाटायचे.

सकाळी थोडे इकडे तिकडे करून आम्ही रत्नागिरी जवळच्या सोमेश्वर गावातले आमचे कुलदैवत ’देव सोमेश्वर’ आणि ढोकमळे गावातील आमची कुलदेवता ’बंदिजाई देवी’ यांचे दर्शन घेवून आलो.

आईबाबांना जास्त सुट्टी नसल्याने दुसर्‍या दिवशी आमची परतिच्या प्रवासाला सुरुवात झाली. आई आणि मी परत चिपळूणला जायचे ठरवले आहे, कारण तिथे आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही म्हणून.

१९ टिप्पण्या:

  1. आनंददादा, खूप enjoy केले. तीन दिवस नुसती धमाल.

    उत्तर द्याहटवा
  2. अरे वा चांगली धमाल केलीस की. . . नवीन बिचवेअर चड्डी मजा आहे अन् समुद्राला का घाबरलास रे??? आई बाबा होते की बरोबर असल्यावर कशाला एवढ घाबरायाच??? तुझा तो रडका फोटो पण मस्त आलाय रे!!!!

    उत्तर द्याहटवा
  3. अरे वा! पिलू कोकणात मस्तच हुंदडलेले दिसतेय... मी पण खूप दिवसांनी चिकू पाहिला... इथे मिळतच नाही.... :( बिचवेअर मध्ये अगदी गोड दिसतोय आमचा रडका आर्यन...

    उत्तर द्याहटवा
  4. बाप रे.. तिसर्‍या पायरीवरून डायरेक्ट जमिनीवर ?? सॉलिड आहेस तू. आणि समुद्राला घाबरून एवढा रडलास कशाला? अरे जाम मजा येते. पुढच्या वेळी जाणार आहेस न तेव्हा न घाबरता बिनधास्त जा पाण्यात :-)

    उत्तर द्याहटवा
  5. वा..बेटा मस्त धम्माल केलीस. थंडी होती तिथे? बरय बाबा इथे तर सगळे उकडतोय..
    पण सोनाली हे काय? दोनच फोटू आर्यनचे? बाकी कुठे आहेत?

    उत्तर द्याहटवा
  6. मनमौजी,
    धमाल तर खूप केली, समुद्राने मला खूप घाबरवले, तो सारखा माझ्यादिशेने लाटा पाठवत होता म्हणून मी घाबरलो.

    उत्तर द्याहटवा
  7. श्रीताई,
    आईने खास समुद्रावर घालायला शिवून घेतली ती बिचवेअर, पण समुद्राने कसला प्लॅन फिसकटवला. आई माझे फोटो काढण्यात पटाईत झाली आहे.

    उत्तर द्याहटवा
  8. हेरंबदादा,
    मला पण एकदम सुपरमॅन झाल्यासारखे वाटले तिसर्‍या पायरीवरून खाली येताना.
    मला पाण्यात खेळायला खूप आवडते पण समुद्राने मात्र माझी घबरगुंडी उडवली.

    उत्तर द्याहटवा
  9. सुहास,
    हे वर्णन आम्ही जानेवारीत गेलेलो तेव्हाचे आहे. तेव्हा होती थंडी, आता गरमा व्हायला सुरुवात झाली आहे.
    बाकीचे फोटू टाकते ब्लॉगवर लवकरच.

    उत्तर द्याहटवा
  10. अरे वाह मज्जा...अरे तुच कय मोठी माणसे सुद्धा घाबरतात बीच वर ...फ़ोटु मस्त आलाय रडका आर्यन... :)

    उत्तर द्याहटवा
  11. सागरदादा,
    मला कधि एकदा या समुद्रापासून दूर जातो असे झाले होते, रडून ओरडून मी सगळ्यांना नकोसे केले होते.

    उत्तर द्याहटवा
  12. अले व्वा...सॉलिड मज्जा केलीय...काय रे आम्हाला आंबा पोळी आणलीस का?? आणि हो भा..मावशीप्रमाणेच आम्हाला पण चिकुची आठवण येतेय....यंदा येतोय खायला..आणि हो अरे आरुषला मी पहिल्यांदी समुद्रावर नेलं होतं ना तेव्हा तो वेड्यासारखा धावत सुटला होता..सगळी लोकं मजेशीरपणे पाहात होते..तू मध्ये मध्ये मुंबईत चौपाटीला जात जा मग मजा येईल तुला...:)

    उत्तर द्याहटवा
  13. अगं अपर्णाताई,
    आंबापोळीला अवकाश आहे अजुन आधि आंबे तर पिकु देत. मी तळलेले गरे, कोकम आणलेत बरोबर. आरूषला पण भिती वाटली ना समुद्राची म्हणजे माझ्यासारखे कुणीतरी आहे.

    उत्तर द्याहटवा
  14. अरे बापरे.. म्हणून खारट झालं वाटतं समुद्राचं पाणी..:)

    उत्तर द्याहटवा
  15. म्हणजे इतका रडला म्हणुन खारट झालं म्हणतोय समुद्राचे पाणी.

    उत्तर द्याहटवा
  16. महेंद्रकाका,
    खर आहे तुमच म्हणणं, समुद्राचे पाणी दोन्ही कारणांमुळे खारट झाले आहे :))))))))))))))

    उत्तर द्याहटवा
  17. खुप धमाल केलीस रे आर्यन..मस्त..बिचवेअर चड्डीतला हसणारा आर्यन पुढे बघायचा आहे मला...म्हणुनच पुढच्या वेळेला त्या समुद्राला अगदि ठणकावुन सांग तु दोन मार्गांनी त्याच पाणी कस खारट केलस ते....मग बघ तोच तुला कसा घाबरतो ... :)

    उत्तर द्याहटवा
  18. देवेंद्रदादा,
    पुढच्यावेळी मी छान समुद्राच्या पाण्यात खेळेन.
    समुद्राला घाबरवायची आयडिया मस्त आहे एकदम.

    उत्तर द्याहटवा